औरंगाबाद : भीमनगर भावसिंगपूरा येथील मुख्य रस्ता व विविध ठिकाणचे अतिक्रमणे काढण्यात यावे,याकरिता वॉर्डच्या नगरसेविका आशा निकाळजे यांनी गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने मागणी केल्यानंतरही मनपा प्रशासनाच्या वतीने अद्यापही कुठलीच कारवाई न केल्याने आज सोमवारी निकाळजे यांनी मनपा मुख्यालया समोर उपोषणाला सुरवात केली.
वॉर्ड क्रमांक १३ भिमनगर -भावसिंगपूरा येथील अतिक्रमण काढण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करुनही प्रशासनाकडून कुठलीच दखल घेण्यात आलेली नाही. यासंबंधी डिसेंबर २०१८ मध्ये वार्डातील नागरिकांसह मनपासमोर उपोषण करण्यात आले. त्यावेळी आठ दिवसांत अहवाल तयार करुन ताबडतोब कारवाई करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले होते. परंतु संबंधितांनी आयुक्तांच्या आदेशांची अंमलबजावणी केली नाही. रमाई चौक ते आंबेडकर चौक या रस्त्याचे क्राँक्रीट करण्याचे काम मंजूर झाले आहे. परंतु अतिक्रमणामुळे हे कामही रखडले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढत असून नगरसेविका म्हणून त्यांच्या रोषाचा सामोरे जावे लागत आहे. या बाबत महापौर,आयुक्तांना वारंवार निवेदन देऊन, प्रत्यक्ष भेट घेऊनही प्रश्न सुटत नसल्याने नगरसेविका निकाळजे यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार आज सोमवारी निकाळजे यांनी वॉर्डातील नागरिकांंसह उपोषणाला सुरवात केली. यावेळी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.